चाकण महाविद्यालयातील युगात्मा शरद जोशी व्याख्यानमालेची सांगता,.
चाकण : प्रतिनिधी
चाकण शिक्षण मंडळाच्या येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात चाकण महाविद्यालय व अभिमन्यू शेलार मित्र परिवाराच्या वतीने गेले तीन दिवस सुरु असलेल्या ” योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी ” वैचारिक व्याख्यानमालेची उत्साहात सांगता करण्यात आली.
वैचारिक व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन उद्योजक डॉ. संजय मालपाणी, उद्योजक अभिमन्यू शेलार, डॉ. अविनाश अरगडे, विश्वस्त मोतीलाल सांकला, प्राचार्य डॉ. राजेश लाटणे आदींच्या हस्ते झाले. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रसिद्ध वक्ते, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी यांनी ‘ रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग ‘ या विषयावर गुंफले. दुसरे पुष्प शेतकरी संघटनेचे नेते विजय विल्हेकर यांनी ‘ शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील अनुभव ‘ या विषयावर गुंफले. याप्रसंगी प्रायोजक अभिमन्यू शेलार, माजी प्राचार्य सुरेचंद्र म्हात्रे, डॉ.दिपक गायकवाड, विजय लोडम, रामदास जाधव, पंकज गायकवाड, ज्ञानेश्वर शेलार, शिवाजी खेडकर, कांताराम लोणारी, निखिल शेवकरी, योगेश गायकवाड, बजरंग बांगर, मारोती पोखरकर, सतीश घुले, निवृत्ती कडलग आदींसह चाकणकर ग्रामस्थ, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व सेवक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संविधानाचे अभ्यासक व प्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीरंजन आवटे सांगता समारंभात म्हणाले,” भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र आहे. संविधानाच्या प्रकाशातच भारतीय नागरिकाला योग्य दिशा मिळणार आहे. संविधानाने स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, न्याय, समभाव व बंधुता ही मूल्ये हरेक भारतीय नागरिकाला मिळाली आहेत. भारतीय संविधानाविषयी प्रत्येकाने कृतज्ञ राहणे, हे आद्य कर्तव्य आहे. ग्रंथावर जीवापाड प्रेम करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. यामागील कार्यकारणभाव डिजिटल युगातील विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे.” डॉ. शिवाजी एंडाईत यांनी प्रास्ताविक, तर समृद्धी मुंगसे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कैलास अस्तरकर यांनी स्वागत केले. अभिमन्यू शेलार यांनी आभार मानले.