चाकण मधील नित्याच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण,. उड्डाणपूल असून अडचण नसून खोळंबा,.
चाकण : प्रतिनिधी
पुणे – नाशिक व चाकण तळेगाव महामार्गावर वारंवार होणाऱ्या नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक ज्येष्ठ नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. पुणे – नाशिक आणि तळेगाव – शिक्रापूर शहरांना जोडणारे मुख्य महामार्ग असलेल्या महामार्गांमुळे हजारो गावे, शहरे एकमेकांना जोडली गेली आहेत. नागरिक, विद्यार्थी, महिला यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे दोन्ही महामार्ग महत्त्वाचे आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. या मार्गावरील आंतर राष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत असल्याने असंख्य अवजड वाहनांची संख्या मोठी आहे.पुणे नाशिक महामार्गावर मुख्य करून चिंबळी फाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा, स्पाईसर चौक, आळंदी फाटा आणि चाकणमधील तळेगाव – आंबेठाण चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांना तासन – तास महामार्गावर उभे राहावे लागत आहेत. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर केली जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षात पुणे नाशिक महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी आता नित्याची झाली आहे. ही मोठी शोकांतिका आहे.
———————————————————————-
” चाकण मध्ये महामार्गावर बांधण्यात आलेले दोन्ही उड्डाणपूल चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत. चाकण – शिक्रापूर रस्त्यावर मेदनकरवाडी फाट्यावर नित्याच्या वाहतूक कोंडीने प्रवाशी रडकुंडीला आले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण होणे अपेक्षित वाटते.” – संकेत मेदनकर, अध्यक्ष, खंडोबा देवस्थान ट्रस्ट, मेदनकरवाडी, चाकण.