सत्यविचार न्यूज :
राजगुरूनगर येथील मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कमान गावातील ठाकरवाडी येथे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करून फेरोसिमेंट पद्धतीच्या जलसंधारण बंधारा फेरोक्रीट तंत्रज्ञानाने 50 फूट लांब व 12 फूट उंचीचा बंधारा बांधण्यात आला. पुण्यातील चितळे बंधू फर्मचे संजय चितळे व वर्षा चितळे यांच्या हस्ते रविवारी (दि. १८ ऑगस्ट) जलपूजन करून या बंधार्याचे उद्धाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना संजय चितळे म्हणाले की, गावातील लोकांचे स्थलांतर होऊ नये म्हणून गावातील लोकांनी एकत्र येऊन गावचा विकास साधने आवश्यक आहे व त्यासाठी या बंधाऱ्यातील पाण्याचा योग्य तो वापर करणे आवश्यक आहे.
राजगुरूनगर येथील मुंबई माता बाल संगोपन संस्थेचे सचिव डॉ. माधव साठे यांनी अथक परिश्रम घेऊन स्वत: पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले. त्यांनी सांगितले की, गावातील श्रीराम सपाट बंधार्यासाठी गेली तीन वर्ष प्रयत्नशील होते. आवश्यक त्या परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि संस्थेकडे आणून दिल्या. संस्थेने धरण काम क्षेत्रातील तज्ञ प्रकाश देशपांडे व पदमनाथ लेले यांचा सल्ला घेत कामाचे आराखडे पूर्ण केले. अत्यंत कमी वेळामध्ये सपाट या ध्येयवेड्या तरुणाने अत्यंत अल्प खर्चात हे बांधकाम पूर्ण केले.
सपाट यांनी मनोगतात सांगितले की, या नवीन बंधाऱ्यात 25 ते 30 लाख लिटर पाणी साठा झाला आहे. या बंधार्याची निर्मिती ही ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या हेतूने करण्यात आली आहे. यामुळे भूजल पातळी वाढणार आहे. शेतीपूरक व्यवसाय तसेच दुसरे व तिसरे पीक लोक घेऊ शकतील. गावच्या आर्थिक स्थैर्यात हातभार लावतील.
याप्रसंगी मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन पाटील व सदस्य प्रा. सय्यद, अनिकेत पाटील, सुनील मुळे, शर्मिला गुजर, विनायक ठोंबरे, ज्योती गोपटे, सुप्रिया केळेवकर, शिरीष जोशी, कमानचे सरपंच मच्छिंद्र रोकडे, माजी सरपंच योगेश नाईकरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश नाईकरे, अमोल नाईकरे, संजय नाईकरे, संदिप मिरजे हयांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई माता बाल संगोपन संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदाने यांनी योगदान दिले. प्रास्ताविक स्वाती शिंदे यांनी केले. सुञसंचालन श्वेता गायकवाड यांनी केले आभार मुख्याध्यापक सुरेश नाईकरे यांनी मानले.