Nitin Gadkari : पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासात; गडकरींची घोषणा
सत्यविचार न्यूज :
वाघोली – पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासात पोहचता येईल, असा नवीन महामार्ग राज्य सरकारच्या माध्यमातून व 10 हजार कोटी रुपये खर्चून पुणे ते शिरूर मल्टीलेयर फ्लाय ओव्हर मार्ग बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाघोलीत केली.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बापू पठारे, प्रदीप कंद, संदीप सातव, शांताराम कटके, विजय जाचक, रामदास दाभाडे उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले, पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. यामुळे कितीही रस्ते बांधले तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. यासाठीच दोन लाख कोटी रुपयांची विकास कामे पुण्यात केली. महाराष्ट्र संतांची भूमी आल्याने पुणे ते पंढरपूर पालखी महामार्ग बांधला. त्याचे निवडणुकीनंतर उद्घाटन होईल.
पुणे, सोलापूर, औरंगाबाद या शहरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी रस्ते बांधणी केली जाणार आहे. विशेषतः पुणे नाशिक व पुणे नगर, चाकण मुंबई या रस्त्यावर मल्टीलेयर फ्लायओव्हर मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. हे रस्ते बांधल्यानंतर कोंडीचा प्रश्न दूर होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोडचा प्रकल्प हाती घेतला. पीएमआरडीएमार्फत अन्य एक रिंग रोड बांधणार आहे. यामुळे बाहेर जाणारी वाहने शहरात येणार नाही. पुण्याचा विस्तार होत असल्याने मेट्रोचा विस्तारही चारही बाजूने करणार आहे. मुळशी धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून पुण्यात पाणी समस्या निर्माण होणार नाही. अशी अनेक विकास कामे करायची आहेत.
यासाठी मोदींना पुन्हा निवडून देण्याची गरज आहे. वाघोलीचे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक संपल्यानंतर त्या प्रश्नाकडे निश्चित लक्ष देईल. डॉ अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. ते अभिनेत्याचेच काम करणार. त्यांना विकास कामे करणे जमणार नाही. यामुळे मतदारांनी आढळरावानाच निवडून द्यावे. असे आवाहनही पवार यांनी केले.
गडकरी यांचे भाषणातील इतर मुद्दे
- शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणणार
- इथेनॉलवर चालणारी बाईक स्कूटर आणणार
- तीन इथेनॉल पंप सुरू करणार
- भारत विश्व गुरु झाला पाहिजे
- जातीय भेद नष्ट झाला पाहिजे
- पाच ट्रिलीयन डॉलर्सची भारताची इकॉनॉमी झाली पाहिजे.
तिसरी महापालिका करणार
पुण्याची तिसरी महापालिका केल्याशिवाय विकास होणार नाही. ती करण्यासाठी गावांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. लोकसंख्या वाढत आहे. योग्य नियोजन करण्यासाठी स्वतंत्र महापालिका गरजेची असून तुम्हाला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.जो कामे करतो तोच चुकतो. मात्र तेच तुम्ही चालवता, असा फटकारा बोलताना पवार यांनी मारला.
आढळराव यांच्या भाषणातील मुद्दे
- कोल्हे पाच वर्षात विकास कामे न करता शूटिंग साठी मुंबईला गेले.
- त्यांचा 80 टक्के खासदार विकास निधी परत गेला.
- अनेक कामांचा मी पाठपुरवठा केला. मात्र श्रेय ते घेतात.
- भाषणा व्यतिरिक्त त्यांना एक रुपया ही निधी आणता आला नाही
- कोल्हे खोटे श्रेय घेत आहेत.
- बैलगाडा शर्यत, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व अन्य विकास कामासाठी मी पाठपुरवठा केला
- खासदार नसतानाही कोट्यवधी निधी मी आणला.