सत्यविचार न्यूज :
Ips Ofiifcer News : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून, त्यातून राज्याचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे. नवनिर्मित मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून दाते यांनी काम पाहिलेले आहे.
अत्यंत प्रामाणिक अशा स्वच्छ प्रतिमेचे महाराष्ट्र केडरचे आय़पीएस अधिकारी सदानंद दाते यांची देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुख म्हणून बुधवारी (ता.२७) नियुक्ती झाली. याद्वारे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून, त्यातून राज्याचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे.
एटीएस तथा एनआयएच्या बदल्या आणि नियुक्त्यांत निवडणूक आचारसंहितेचा अडसर येत नाही. त्यामुळे ही व इतर दोन नेमणुका या निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय करण्यात आल्या आहेत. १९९० च्या आयपीएस बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले दाते हे सध्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख तथा डीजीपी आहेत.
ते एनआयएचे डीजीपी म्हणून १ एप्रिलपासून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख दिनकर गुप्ता हे या महिनाअखेर रिटायर होत आहेत. त्यानंतर दाते त्यांच्या जागी रुजू होतील. त्यांच्या पदाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे.
नवनिर्मित मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून दाते यांनी काम पाहिलेले आहे. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
कामा आल्बेस रुग्णालयातील महिला व मुले रुग्णांना पाकिस्तानी अतिरेक्यांनी ओलिस धरले होते. त्यांची सहीसलामत सुटका दातेंनी केली होती. त्याबद्दल त्यांना राष्ट्र्पतींचे शौर्यपदक देऊन त्यानंतर गौरविण्यात आले होते. प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
एनआयएचे प्रमुख म्हणून यापूर्वी महाराष्ट्रातील आयपीएस आणि दातेंसारखेच सोज्वळ अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी (Atulchandra Kulkarni) यांनी काम पाहिलेले आहे. या दोघांत अनेक साम्ये आहेत. या दोघांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केलेले आहे. दोघेही १९९०च्याच आयपीएस (Ips )बॅचचे अधिकारी आहेत.