‘ती तर भूषणावह बाब!’ युवक मारहाण प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांच विधान; म्हणाले, “मारहाणीचा पश्चाताप…”
आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत संजय गायकवाड यांनी या मारहाणीचे समर्थन करतानाच त्याची कारणमीमांसा केली.
बुलढाणा: शिवजयंती मिरवणुकीत आपण ‘त्या’ युवकास केलेल्या मारहाणीचा, आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. आज शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आमदारांनी या मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याची कारणमीमांसा केली. बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती.
मात्र, पोलिसांना मिरवणुकीत ते गवसले नाही. जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली. ‘ते’ चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले. त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली. माताबहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती, नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते. यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह बाब आहे. यापुढेही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव केला तर आपण ‘कारवाई’ करणारच असे ते ठासून म्हणाले.