मुंबई बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू
सत्यविचार न्यूज :
गेटवे ऑफ इंडिया इथून एलिफंटा बेटावर ८० पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या निलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी चार वाजता घडलेल्या या गंभीर अपघातात अनेकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. यापैकी रेस्कू केलेल्या ५७ प्रवाशांना जेएनपीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये एका १२ वर्षाच्या अनोळखी मृत मुलाचा समावेश आहे. तसेच रात्री उशिरा १० मृतदेह हे उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात आणले आहेत, त्यापैकी ८ जणांची ओळख पटवण्यात यश आलं.
जेएनपीए रेस्कू स्कॉडच्या मदतीनं रेस्कू केलेल्या ५७ पर्यटकांना जेएनपीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दाखल करण्यात आलेल्या ५७ पर्यटकांवर उपचार करून त्यांना दादर इथं बसनं सोडून देण्यात आलं. यामध्ये दोन विदेशी पर्यटकांचाही समावेश होता. ५७ पर्यटकांपैकी दुदैवानं मृत्यू झालेल्या अनोळखी १२ वर्षीय मुलाच्या नातेवाईकांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नसल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी दिली.
दरम्यान जेएनपीए रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बहुतांश पर्यटकांनी जवळचा पैसे सामान हरवले आहे. माणूसकीच्या दृष्टिकोनातून त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था तसेच खर्चासाठी काही रक्कमही जेएनपीए कामगार ट्रस्टी दिनेश पाटील यांनी दिली. यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ, कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, रविंद्र पाटील, अन्य अधिकारी, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी पर्यटकांची विचारपूस केली.
रात्री उशिरापर्यंत उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दहा मृतदेह आणण्यात आले. यामध्ये ८ जणांची ओळख पटली आहे. त्यामुळे प्रशासन या मृतदेहांना नातेवाईकांच्या हवाली करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान निलकमल बोट अपघातात तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.